मोदींची गॅरंटी खोटी निघाली, लोकांच्या विश्वासाला तडा – शरद पवार

महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतंय की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाहीये, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.

महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतंय की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाहीये, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीकास्त्र सोडलं. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपची महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली आणि केंद्रातही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नसून एनडीएचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही सरकारचे कान टोचण्यात आले होते. त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, शरद पवार यांनी लोकांचा सरकारवर विश्वास उरला नसल्याचे नमूद करत टीका केली.

भुजबळांशी संपर्क नाही

मी राष्ट्रवादी सोबत आहे, अजित दादांसोबत नाही, या छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने आणि त्यांचा सध्याच्या एकंदर भूमिकेमुळेच ते शरद पवार गटासोबत पुन्हा जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा, याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं.

त्यांच्या या विधानामागची पार्श्वभूमी काय हे मला माहीत नाही. माझी त्यांची वर्ष-सहा महिन्यांत भेट नाही. त्यामुळे त्यांच्या विधानबद्दल मला काही माहीत नाही असे शरद पवार म्हणाले. त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आधी लोकसभा नतर राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून भुजबळांचं पुढलं पाऊल काय असेल याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत.

Leave a Comment